शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, एनटीए रद्द करा, एनईपी २०२० रद्द करणे, मुंबईतील सर्व कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका पुन्हा सुरू करा. शालेय अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षण संस्थांचे भगवीकरण थांबवा इत्यादी मागण्यांकरिता मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये विविध पुरोगामी संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या 'मुंबई अगेन्स्ट सप्रेशन ऑफ स्टुडंट्स' (MASS) या संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. २०१७ पासून एनटीएच्या (NTA) स्थापनेनंतर विनाशकारी परिणाम अनुभवलेल्या अनेक विद्यार्थ्यांसह अनेक मुंबईकर या आंदोलनात सहभागी झाले होते. ही असंवैधानिक संस्था असंख्य विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी आणि ९० हून अधिक पेपरफुटींसाठी जबाबदार आहे. झुरळांप्रमाणे वागवून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये वाढत्या असंतोषाने शिक्षणाच्या खाजगीकरण आणि केंद्रीकरणाविरोधात एकजुटीने आंदोलनाचे आवाहन यावेळी करण्यात आले.
'सार्वजनिक शिक्षणासाठी झुरळे' या घोषणेखाली विद्यार्थी-युवकांनी आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना धमकावले आणि त्यांना आपल्या समस्या मांडू दिल्या नाहीत. मुंबई पोलिसांनी कलिना कॅम्पससमोर जमलेल्या विद्यार्थ्यांना घेरले आणि विद्यार्थिनींसह अनेकांना जबरदस्तीने हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आपल्या समस्या योग्यरित्या मांडणाऱ्या निरपराध विद्यार्थ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. एआयएसएफ, सत्यशोधक, दिशा, आमची पढाई आमची लढाई आणि एसएफआय यांसारख्या विविध संघटनांमधील १२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र अशा धमक्यांना न जुमानता, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यातही आंदोलन केले, तर अनेक विद्यार्थी बीकेसी पोलीस ठाण्याच्या गेटबाहेर एकजुटीने उभे राहिले.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, एनटीए रद्द करा, एनईपी २०२० रद्द करणे, मुंबईतील सर्व कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका पुन्हा सुरू करा. शालेय अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षण संस्थांचे भगवीकरण थांबवा. केजी ते पीजी: सर्वांसाठी मोफत, समान, दर्जेदार आणि वैज्ञानिक शिक्षण. सक्तीच्या डिजिटायझेशनला विरोध करा, केंद्रीय अर्थसंकल्पातील १०% शिक्षणावर खर्च करावा. विद्यार्थी आत्महत्यांवर संसदीय समिती स्थापन करणे - पीडित कुटुंबांसाठी कल्याणकारी योजना सुरू करणे. महाराष्ट्रभरातील शाळा रद्द करण्याचे आणि विलीन करण्याचे निर्णय मागे घ्या. इत्यादी मागण्यांकरिता मास फ्रंटने गेल्या काही दिवसांपासून व्यापक प्रचार अभियान राबवत आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या