..महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर साम, दाम, दंड, भेद नितीचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतानाही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निर्धाराने व न डगमगता लढले व विजय मिळवला. अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत मिळालेले यश मोठे नसले तरी समाधानकारक आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देऊ, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
राजीव गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांना संपवण्याचे काम करत आहे. विरोधी पक्षातील उमेदवार पळवणे, पक्ष फोडणे, विरोधी पक्षाला कोणतीच मदत मिळू नये, निधी मिळू नये असे सर्व प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले. अनैतिक वातावरणातही काँग्रेस पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते तग धरून उभे राहिले, निकराने लढले. काँग्रेसने १५२ उमेदवार उभे केले होते त्यातील २४ निवडून आले आहेत. महानगरपालिका निवडणुकीतील या निकालाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हुरुप ढललेला नाही, हा विजय ऊर्जा देणारा आहे, पुन्हा नव्या ताकदीने व जिद्दीने लढू, आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू तसेच निकालाचे विश्लेषण करु. लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई यापुढेही लढत राहू.
ऑपरेशन कमळ करुन भाजपाने विरोधी पक्ष फोडले पण आता या ऑपरेशन कमळची भिती भाजपाच्या मित्रपक्षांनाही वाटू लागली आहे. ऑपरेशन कमळच्या भितीनेच एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे विजयी नगरसेवक लपवावे लागत आहेत, असेही सचिन सावंत म्हणाले.., वंचित बहुजन आघाडी संदर्भात जो आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे, त्यांना हव्या असेलल्या जागा दिल्या, त्यांना उमेदवार मिळाले नाहीत, काही जागांवर मैत्रिपूर्ण लढावे लागले. दोन्ही बाजूकडून अधिक चांगल्या प्रकारे नियोजन झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे सचिन सावंत म्हणाले.
........
"विरोधकांचे सल्लागार सडके आणि विरोधक रडके," अशी टीका आशिश शेलार यांनी केली होती. शेलारांच्या या टीकेचा समाचार घेताना अतुल लोंढे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
१. शाईचा दर्जा आणि आयोगाची भूमिकाः....अतुल लोंढे यांनी शाई पुसली जाण्याच्या प्रकारावर गंभीर आक्षेप घेतला. ते म्हणाले, "आशिष शेलारजी, चोराला चोर म्हटले तर तुम्हाला मिरची का लागली? शाई मिटली नाही पाहिजे, ही जबाबदारी आयोगाची आहे. पूर्वी शाई लावल्यावर कातडी निघायची पण शाई जात नव्हती. आता तुम्ही मार्कर पेनने शाई लावता का? प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाच्या बचावासाठी भाजपाच पुढे का येते, हा प्रश्न आहे."
२. मतदार यादीतील गोंधळः....एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत लोंढे यांनी स्वतःचे उदाहरण दिले. "माझ्या घरातील सहा जणांचे मतदान पाच वेगवेगळ्या केंद्रांवर आणि वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेले आहे. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत असे झाले नव्हते, मग आताच असे का?" असा जाब त्यांनी विचारला. तसेच, "ऑनलाईन मतदार यादीत नाव दिसते, पण बूथवरील यादीत नाव नाही," या तफावतीवरही त्यांनी बोट ठेवले.
३. बोगस मतदानाचा आरोपः...दलित वस्तीतील मतदान इकडे-तिकडे हलवले जात असल्याचा आरोप करत लोंढे यांनी बोगस मतदान कोण करून घेत आहे, असा सवाल उपस्थित केला. "विरोधक रडकुडीला आले नाहीत, तर तुम्ही रडकुडीला आला आहात म्हणून अशा चोऱ्यामाऱ्या करत आहात," अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
४. मंत्र्यांचा वावरः....निवडणूक काळातही भाजपाचे पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्री रस्त्यांवर फिरून बैठका घेत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. "महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणारे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता?" असा टोलाही लोंढे यांनी लगावला. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या प्रकारांमुळे आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या प्रश्नांवर भाजपा आणि निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

0 टिप्पण्या