मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात बांधकामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर टीका करत या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे.या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवा आणि भिवंडीदरम्यान उल्हास नदीवर मुख्य रेल्वे पूल उभारण्यासाठी बांधण्यात आलेला तात्पुरता लोखंडी पूल नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला आहे. बुलेट ट्रेनच्या मुख्य पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १० फूट रुंदीचा तात्पुरता लोखंडी पूल उभारण्यात आला होता. या पुलाच्या माध्यमातून यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक केली जात होती. ती ठप्प झाली असून मुख्य पुलाच्या कामाला काही महिन्यांचा विलंब होण्याची शक्यता आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी पुलावर कोणतेही कर्मचारी किंवा वाहने नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे काय सुरू आहे? मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे येथे बांधण्यात येत असलेला हा पूलही वाहून गेला. राज्यात, केंद्रात आणि ठाण्यात भाजपची सत्ता आहे. असा सवाल करण्यात आला आहे. तसेच, आता यावर काही बोलले तर नागरिक महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे म्हणणार का? पण तुमच्या सरकारने दिलेल्या कंत्राटांमुळे पूल कोसळतात, रस्त्यांवर खड्डे पडतात, दरडी कोसळतात; त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.
0 टिप्पण्या