राहुल सांकृत्यायन यांचा पुतळा नष्ट करण्यात आला आहे. सांकृत्यायन यांचे सुपुत्र प्रा. जेता सांकृत्यायन यांचे जाहीर निवेदन (१७ जुलै २०२६)
१९९४ मध्ये, महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे 'राहुल सांकृत्यायन जन्मशताब्दी आयोजन समिती'तर्फे राहुलजींचा ९ फुटी पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला होता. या समितीचे अध्यक्ष खासदार हाराधन राय आणि सचिव विवेक चौधरी हे होते. राणीगंज (जिल्हा बर्धमान) येथील 'कोलियरी मजदूर सभा ऑफ इंडिया' (CMSI) आणि 'इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड' (ECL) यांच्या पुढाकाराने या जन्मशताब्दी समितीची स्थापना करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी, सकाळी साडेअकराच्या सुमारास मला राणीगंजमधून एक फोन आला. राणीगंजमधील राहुलजींचा हा पूर्णकृती पुतळा काही अज्ञात समाजकंटकांनी फोडून उद्ध्वस्त केल्याचे मला सांगण्यात आले. माझ्या दिवंगत वडिलांच्या आदराच्या आणि बौद्धिक वारशाच्या या अमानुष विटंबनेवर सांकृत्यायन कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे, अशी विचारणा त्यांनी केली.काल संध्याकाळपासूनच मला वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांचे सतत फोन येत आहेत, सर्वजण यावर माझे वैयक्तिक मत विचारत आहेत. सध्या माझी तब्येत अतिशय नाजूक आहे. या तोडफोडीच्या धक्क्याने मनावर प्रचंड ताण आला असून, मी स्वतःवर नियंत्रण ठेवत या मानसिक आघातातून सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. "विनाशाचे हे कृत्य बंगालमधील भाजपच्या वाढत्या प्रभावाशी थेट जोडलेले आहे. संघ परिवाराला राहुलजींचे जीवन, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान आणि त्यांचे हिंदी साहित्य या सर्व गोष्टींचे महत्त्व कमी करण्याची तीव्र गरज वाटू लागली आहे, हेच यातून दिसते."
या घटनेनंतर मला तासनतास येणाऱ्या भेटीगाठी घेणाऱ्यांशी आणि पत्रकारांशी बोलावे लागत आहे, दीर्घ वैयक्तिक तसेच टीव्ही चॅनेल्सना मुलाखती द्याव्या लागत आहेत. सिलीगुडीतही सार्वजनिक निषेध सभा होणार आहेत आणि त्यात मला सहभागी व्हावेच लागेल. हे मी टाळू शकत नाही, कारण हा माझ्या वडिलांच्या स्मृतीचा अपमान आहे. एका नियोजनबद्ध कटाचा भाग म्हणून त्यांचा पुतळा जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करण्यात आला आहे. संपूर्ण भारतात याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अशा वेळी राहुलजींचा मुलगा म्हणून लोक जेव्हा माझ्याशी संपर्क साधत आहेत, तेव्हा वडिलांप्रती असलेल्या कर्तव्यापासून मी तोंड फिरवू शकत नाही. माझी किडनीची आजारपणं आणि डायलिसिसच्या उपचारांचे कारण पुढे करून मला घरात बसून राहता येणार नाही.
राणीगंजमधील राहुलजींच्या स्मारकावर झालेला हा हल्ला म्हणजे इथल्या मजबूत कोळसा खाण कामगार संघटनांना (कोलियरी ट्रेड युनियन्स) संपवण्याचा आणि इस्टर्न कोलफील्ड्सचे खाजगीकरण करून ते भारतातील नव्या 'ऊर्जा-सम्राटांच्या' (एनर्जी बॅरन्स) घशात घालण्याच्या भगव्या लाटेचाच एक भाग आहे. त्रिपुरावर ताबा मिळवल्यानंतर तिथे ज्याप्रमाणे लेनिनचा पुतळा जाणीवपूर्वक पाडण्यात आला, अगदी तसाच हा प्रकार आहे. राहुलजी ज्या पुरोगामी विचारांसाठी जगले आणि आयुष्यभर लिहीत राहिले, तो सगळा वारसाच मुळासकट उपटून टाकण्याची संघ परिवाराची ही सुप्त इच्छा आहे; विशेषतः हिंदी भाषिक पट्ट्यात, जिथे आजची तरुण पिढी आजही त्यांचे साहित्य वाचून प्रेरणा घेते. 'राहुल' यांच्या जागी 'राम' यांना आणून बसवायचे आणि पुरोगामी विचारसरणी कायमची संपवून टाकायची, असा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे.
मी एक सामान्य माणूस आहे, वय वर्ष ७२ आहे. प्रकृतीही साथ देत नाही. माझ्याकडे स्वतःची अशी कोणतीही मोठी साधनसामग्री किंवा पोहोच नाही, ज्याच्या बळावर मी हा संदेश देशातील तमाम जनसंघटना, हिंदी साहित्यविश्व आणि जागरूक विचारवंतांपर्यंत पोहोचवू शकेन. त्यामुळे मी केवळ या सर्वांच्या सामूहिक एकजुटीला, सद्सद्विवेकबुद्धीला आणि सद्भावनेला साद घालू शकतो. त्यांनी पुढे यावे, या रानटी कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करावा आणि दोषींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी करावी, हीच माझी विनंती आहे.
(मूळ इंग्रजी निवेदनाचा स्वैर मराठी अनुवाद)

0 टिप्पण्या