: महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात एकदिवसीय मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महिला शिक्षिका, शिक्षक तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा होऊन बराच कालावधी लोटला आहे. त्याचवेळी राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त असून शासनाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा तातडीने राबवावा, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीची प्रतीक्षा करणाऱ्या शिक्षकांना डावलून नवीन भरती केल्यास त्यांच्यावर अन्याय होईल, असा दावा संघटनेने केला आहे. जनगणनेच्या कामामुळे अडचण असल्यास बदली प्रक्रिया पूर्ण करून कार्यविमुक्ती ३१ मार्च २०२७ नंतर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या