गोरेगांव मधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण पूर्ण होऊन हा टप्पा नागरिकांच्या सेवेत आज ६ जून सायंकाळपासून खुला होत आहे, या पुलामुळे प्रवासाचा पूर्वीचा पाऊण तासाचा कालावधी आता १० मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे वेळेसोबतच इंधन बचतही होणार आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारीत टप्प्याचे लोकार्पण मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर. संजय घाडी यांच्या शुभहस्ते आज सकाळी करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार विद्या ठाकूर, स्थानिक आमदार हारून खान, आमदार अमित साटम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी (सक्रे), पी दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षा श्रीमती श्रीकला पिल्ले, विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर, स्थानिक नगरसेवक संदीप पटेल, स्थानिक नगरसेवक जिशान मुलानी, नगरसेविका श्रीमती प्रीती सातम, नगरसेविका श्रीमती वर्षा टेंबवलकर, नगरसेवक विक्रम राजपूत, नगरसेवक हर्ष पटेल, नगरसेविका श्रीमती लक्ष्मी भाटिया, नगरसेविका सबा हारून खान यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार कामात वालभट नदीवरील विद्यमान पुलाचे पाडकाम करून पुनर्बांधणी करण्यात आली आहे. तसेच, विद्यमान मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तार कामाशी एकत्रीकरण, अंदाजे ४५० मीटर लांबीच्या (२+२ मार्गिका) पोहोच मार्गाचे सुधारीकरणदेखील करण्यात आले आहे. विस्तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्त्याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे ३० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ ते १० मिनिटांपर्यत येणार आहे. तसेच, स्वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
दाट लोकवस्ती, अत्यंत वर्दळीचे चौक, वाहतुकीची घनता यामुळे पोलिस वाहतूक परवानगी मिळविणे जिकीरीचे होते. मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या उतारात (Landing) बदल करण्याच्या स्थानिक रहिवाशांची विनंतीचा विचार करत जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (GAD) नुसार पुलाच्या आरखड्यात सुधारणा करण्यात आली. त्यात संरेखन (Alignment) व लांबीचा समावेश आहे. या उड्डाणपुलाचे संरेखन वालभट नदी आणि ओशिवरा नदीवरून जाते. ही दोन्ही ठिकाणे रस्त्याच्या समपातळीवर (at grade) आहे. वालभट नदीवरील आणि ओशिवरा नदीवरील विद्यमान पुलाचे पाडकाम व पुनर्बाधणी करताना वाहतूक सुरु ठेवून कामकाज तीन टप्प्यांत पूर्ण करावे लागले आहे. अशा विविध आव्हानांवर मात करत महानगरपालिकेच्या पूल विभागाने मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

0 टिप्पण्या