:बिहार राज्यातील बोधगया येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मस्थळ महाबोधी महाविहार यावरील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या ज्वलंत आणि विवादित प्रश्नाची खरी परिस्थिती सर्वांसमोर आणण्यासाठी ‘बोधगया सत्य आणि विपर्यास’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे लेखक अॅड. संदीप जाधव (मुंबई उच्च न्यायालय) असून, प्रकाशन सोहळा मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी सायं. ७ वाजता प्रभादेवी, दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.या पुस्तकामध्ये महाबोधी महाविहाराची खरी पार्श्वभूमी, न्यायालयीन लढाया, खटले, बौद्ध समाज व तेथील हिंदू महंतांच्या मागण्या तसेच या संवेदनशील मुद्द्याशी संबंधित सर्व बाजू सोप्या व स्पष्ट भाषेत मांडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा प्रकाशन सोहळा महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अनार्य पवार राहणार असून, निमंत्रक म्हणून जयवंत तांबे व नितीन वाघमारे उपस्थित राहतील. प्रमुख वक्ते म्हणून लेखक अॅड. संदीप जाधव स्वतः मार्गदर्शन करतील. या सोहळ्याचे आयोजन अधिष्ठान सामाजिक संस्था तसेच इतर सहयोगी संस्थांनी केले आहे. महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध समाजाकडून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शेकडो आंदोलने, निदर्शने व मोर्चे निघाले आहेत. २०२५ मध्ये या प्रश्नावर हजारोंच्या संख्येने तीव्र आंदोलनांची नोंद झाली असून, या चळवळीची तीव्रता वाढतच चालली आहे.

0 टिप्पण्या