Top Post Ad

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद

 स्त्री मुक्ती चळवळीला ५० वर्ष पूर्ण झाल्याने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये येत्या २०,२१ आणि २२ डिसेंबरला तीन दिवसीय राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत गेल्या ५० वर्षांतील स्त्री चळवळीचा आढावा आणि पुढील ५० वर्षांच्या कामाची दिशाही ठरविण्यात येणार आहे.   परिषदेची माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे, उपाध्यक्ष चयनिका शहा, सचिव अड निशा शिवुरकर आणि खजिनदार डॉ. छाया दातार यांनी माध्यमांना संबोधित केले. तसेच, यावेळी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या सदस्या लता भिसे सोनावणे, मनिषा गुप्ता, हसिना खान, सुनिता बागल आणि शुभदा देशमुख उपस्थित होत्या.  एका बाजूला स्त्रियांमध्ये खूप प्रगती झाली म्हणून आपण कौतुक करतो पण व्यक्तीवाद वाढला आहे. स्त्रियाही स्वत: पुढेच बघत आहेत. समूहाची भावना जागृत करणे असाही आमचा प्रयत्न आहे. स्त्री मुक्ती चळवळ केवळ ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव नाही तर सध्याच्या राजकारणाचे आणि अर्थकारणाचे भान जागरूक करणे आणि त्यासाठी लढण्यास तरुण पिढीला तयार करणे असाही उद्देश असल्याचे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले.

परिषदेसाठी बनलेली सुकाणू समितीच्या सदस्यांनी  पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातून येणा-या प्रतिनिधींचे स्वागत करण्यास सज्ज आहोत, असे त्यांनी सांगितले. आम्ही जी सुकाणू समिती तयार केली ती अतिशय लोकशाही पध्दतीने तयार केली. यासमीतीची पहिली बैठक ११,१२ जानेवारीला बोलावली आणि ज्यांनी वेळ द्यायचे मान्य केले त्या व्यक्ती व संघटनांचा समावेश केला. ७० संघटना यामध्ये सामील आहेत. या संघटना महाराष्ट्र व्यापी आहेत हे महत्वाचे आहे. त्यामुळी तेथील प्रश्न समजून घेणे, तेथील नेतृत्व तयार करणे हे आमचे उद्दिष्ट राहिले आहे. स्त्री चळवळीला बाधा आणणारे अनेक घटक सध्या काम करत आहेत. स्त्रियांच्या चळवळीने आजपर्यंत साध्य केलेले यश, मागण्या यांची परिपूर्ती झाली होती तीही आता हळूहळू मागे हटवली जात आहे. उदा द्यायचे झाले तर महिला आयोगाचे देता येईल. १९९३ साली हा आयोग स्थापन झाला तेव्हा पासून अनेक वर्षे त्याचे स्थान  व कार्य हे अनेक संघटनांना बरोबर घेऊन चालू होते . विचारविनिमय चालू असत. स्त्रियांवर कोठे अन्याय झाला असेल तर चौकशी समितीमध्ये संघटनांच्या सभासदांना सामील करून घेतले जाई. ते सर्व बंद झाले आहे. अनेक कायद्यांच्या अमंलबजावणी बद्दल हे बोलता येईल. महिला बजेट साठी आम्हाला बोलावणे येई. काही संशोधन प्रकल्प आमच्यातर्फे केले जात व स्त्रीयांचे प्रश्नाचे स्वरूप समजून येई हे आता होत नाही.

स्त्री चळवळीच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. पारलिंगींचा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. केवळ समाजापासून त्यांना त्रास होत नाही तर घरी आईवडिलांना त्यांचे प्रश्न समाजावून घेता येत नाहीत. आमचा दुसरा आक्षेप आजच्या वातावरणाला आहे. आज आक्रमकता, आणि हिंसा याला प्रोत्साहन मिळत आहे. क्रिश्चन आणि मुस्लिम स्त्रीयांना याचे परिणाम मोठ्या प्रमाणात सहन करावे लागत आहेत. स्त्रियांची प्रगती तेव्हाच होउ शकते जेव्हा समाजात विचारांना उत्तेजन दिले जाते, शांतीला  महत्व येते. सर्व समाज घटकांना एकमेकांशी मिळून मिसळून एकमेकांचे विचार, धार्मिक भावना समजून घ्यायला वेळ मिळतो. यावेळी आमचे वैशिठ्य म्हणजे आम्ही स्त्री चळवळीची पायाभूत उभारणी करणा-या स्त्रियांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीने काम करणा-या फातिमा शेख व हिंदू धर्माला नाकारून क्रिश्चन धर्म स्वीकारणा-या पंडिता रमाबाई या तिघींचा फोटो व्यासपीठावर लावणार आहोत. आम्ही सर्व धर्मातील स्त्रियांना बरोबर घेउन जाउ इच्छितो हा संदेश आहे.    

तीन दिवसांच्या या परिषदेत पहिल्याच दिवशी घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, वैवाहिक व कौटुंबिक हिंसाचार, जातीय व सांप्रदायिक हिंसाचार, तसेच संविधानासमोरील आव्हाने यांसारख्या विषयांवर गटचर्चा व परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी आर्थिक व राजकीय स्थिती, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण व विकास, तसेच नवीन कामगार कायदे याविषयावर तज्ज्ञांची मतं मांडली जाणार आहेत. परिषदेच्या दरम्यान नाटक, माहितीपट आणि नृत्यनाट्य असे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जातील. परिषदेच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात स्त्री मुक्ती परिषदेची जाहीर सभा होणार आहे. या सभेत विविध समुदायांची निवेदने सादर केली जाणार आहेत. याशिवाय परिषदेच्या पुढील कामाची दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेत राज्यभरातील महिला संघटना, कार्यकर्ते आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

स्त्री मुक्ती चळवळ केवळ ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून उत्सव नाही तर सध्याच्या राजकारणाचे आणि अर्थकारणाचे भान जागरूक करणे आणि त्यासाठी लढण्यास तरुण पिढीला तयार करणे हा उद्देश आहे. आमचा आक्षेप आजच्या वातावरणाला आहे तो आक्रमकता आणि हिंसा याला प्रोत्साहन देत आहे. स्त्रियांची प्रगती ही तेव्हाच होऊ शकते जेव्हा समाजातील लोकांच्या विचारांमध्ये बदल होईल. महिलांचे प्रश्न समाजासमोर मांडत त्या प्रश्नांची उत्तर सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत. निराधार, गरजू महिलांपर्यत पोहचण्यासाठी पोस्टर्स, कलापथकं आणि भाषणे हा त्रिसूत्री कार्यक्रमातून परिषदेने आजतागायत अनेक उपक्रम राबविले जाणार आहे. संपूर्ण महिलांना स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आम्ही निराधार महिलांना पाठबळ देण्याचे काम करत आली आहे. मात्र आता स्त्री मुक्ती परिषद पुढील अध्यायाला सुरुवात करत असताना, संघटना लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहोत. वर्धापन दिन कार्यक्रम चिंतन, उत्सव आणि पुढील वर्षांमध्ये सतत प्रभावासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल, अशा विश्वास स्त्रीमुक्ती परिषदेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com