मुंबई :कुलाबा येथील हाऊस गल्ली परिसरात एम.बी.पी.टी.च्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या अकबर प्लाझा नावाच्या बेकायदेशीर कायमस्वरूपी बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचा उघडपणे अवमान होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी, बीएमसी प्रभाग कार्यालय, एसीपी झोन-१ आणि कुलाबा पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रारी, व्हिडिओ आणि दस्तऐवजी पुरावे सादर केले आहेत. मात्र, तरीही अकबर प्लाझाशी संबंधित बेकायदेशीर दुकाने, गाळे, सार्वजनिक रस्ता व पादचारी मार्गावरील अतिक्रमण तसेच एम.बी.पी.टी. जमिनीवरील अनधिकृत कायमस्वरूपी बांधकामे आजही सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला.
एप्रिल २०२५ मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, प्रत्यक्षात अतिक्रमणे हटवली न जाता त्यात वाढ होत असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे. ही बाब न्यायालयाचा अवमान असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कर्तव्यातील गंभीर कसूर दर्शवते, असेही त्यांनी नमूद केले. ही लढाई पूर्णपणे जनहितार्थ असून सार्वजनिक जमिनीचे संरक्षण, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी हाच आपला उद्देश असल्याचे संतोष चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव, खोट्या झिरो नंबर तक्रारी, एनसीआर व प्रस्तावित गुन्ह्यांद्वारे आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुरावे सादर केले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा संरक्षण मिळालेले नाही, असा आरोप आहे.
0 टिप्पण्या