मराठी भाषा आणि संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत कराव्यात: ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके
संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, चक्रधर स्वामींच्या लिळाचत्रांपासून अनेक संतांचे अभंग, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनमानसामध्ये रुजवलेली मराठी भाषा आणि संस्कृतीविषयीची निर्माण केलेली उमेद तसेच आजवरच्या अनेक साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीला संपन्न आणि समृद्ध करण्याचे कार्य केले आहे. इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण, आपल्या मुलांनी, तरुणांनी मराठी भाषा विसरता कामा नये. मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत कराव्यात, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक श्री. वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.
कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा’ शुभारंभ कार्यक्रमात ते आज (दिनांक २७ फेब्रुवारी २०२६) बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, विरोधी पक्ष नेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी (सक्रे), शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर, बेस्ट समिती अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वासराव, गटनेते श्री. अमेय घोले, गटनेते श्री. विजय उबाळे यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, सह आयुक्त (सुधार) श्री. संजोग कबरे, ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती प्रभा गणोरकर यांच्यासह विविध खात्यांचे उप आयुक्त, संचालक, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक श्री. वसंत आबाजी डहाके व्याख्यानात म्हणाले की, मराठी भाषेचे वैभव पाहायचे असेल तर एकदा तरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येकाने वाचायला हवी. मराठी भाषेचा अवकाश किती मोठा आहे हे ज्ञानेश्वरीच्या एकेका शब्दातून कळते. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्यापैकी भक्तीयोगातून वारकरी पंथ आला. पंढरीच्या विठ्ठलास केंद्रस्थानी ठेवून विविध अभंगांद्वारे वारकरी पंथाने संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्याचे काम केले. अनेक जाती-धर्मांचे संत झाले पण त्यांनी त्यांच्या अभंगातून मराठी भाषेला संपन्न आणि समृद्ध करण्याचे कार्य केले. आपली मराठी भाषेशी नाळ जुळलेली आहे. याचा अर्थ अन्य भाषा अवगत करण्याची गरज नाही, असा होत नाही. जगभरातील काम, संपर्क, ज्ञान आदींसाठी एक भाषा आवश्यक असते. पण ती अवगत करत असताना आपण मराठी भाषेपासून दूर जाता कामा नये. आपण आपली भाषा आणि संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत करायला हव्यात. भाषेचा प्रवास कायमच होत असतो. भाषा एकमेकांना जोडणारा पूल आहे. मराठी भाषा ही वैभवसंपन्न आहे आणि ही वैभवसंपन्नता अशीच कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, असे आवाहन देखील श्री. डहाके यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय समारोपात महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या, मराठी भाषेचा जागर करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबवले जातात. प्रत्येकांनी मराठी भाषेत व्यवहार करावेत. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नगरसेवक, अधिकारी व नागरिकांनी मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन श्रीमती रितू तावडे यांनी यावेळी केले.
उपमहापौर श्री. संजय घाडी म्हणाले, जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे मराठी भाषेचा अभिमान बाळगला जातो. संत ज्ञानेश्वरांपासून प्रत्येक संतांनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक योद्धांनी मराठी भाषेला महत्त्व दिले. आजच्या दिनी आपण प्रत्येकांनी निश्चय करायला हवा की, महिन्यात किमान एकतरी मराठी पुस्तक वाचायलाच हवे. प्रत्येकाने आपल्या पाल्यांना मराठी भाषा प्रभावीपणे शिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कामकाजामध्ये मराठी भाषेचा अगत्याने वापर केला जातो. मराठी भाषेप्रतीचा हा आग्रह कायमच राहील, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने सुमधूर व प्रेरणादायी मराठी गौरव गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या ‘वैभव मराठीचे, सौंदर्य व्याकरणाचे’ या पुस्तिकेचे मोफत वितरण यावेळी करण्यात आले. श्रीमती स्मिता गव्हाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
एकपात्री अभिनय स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव.... बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये श्रीमती स्वाती शिवशरण (प्रथम), श्री. गणाधीश घाडी (द्वितीय), श्रीमती सुरेखा मराठे (तृतीय) श्री. योगेश माने (उत्तेजनार्थ), श्री. मंदार तांबे (उत्तेजनार्थ) यांचा समावेश होता.

0 टिप्पण्या