रत्नागिरी तालुक्यातील मौ.विल्ये,बौद्धजन विकास कमिटी स्थानिक तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मानका आप्पा समिती,डी.सी.सी क्रिकेट क्लब आणि मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कालकथित सामाजिक कार्यकर्ते जयराम धाकू कांबळे यांच्या निवासस्थानी चक्रवर्ती सम्राट अशोका जयंती मा.अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी शूर पराक्रमी राजे सम्राट अशोका यांच्या प्रतिमेला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळाच्या सदस्या अनिता कांबळे आणि कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सदर जयंती कार्यक्रमाची प्रस्तावना मा.नरेश तुकाराम कांबळे केली तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.चंद्रकांत कांबळे यांनी विल्ये बौद्धजन विकास स्थानिक कमेटीस चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिमा भेट देऊन मनोगत व्यक्त करून चक्रवर्ती सम्राट अशोका बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.सम्राट अशोका केवळ एक पराक्रमी राजे नव्हते तर ते मानवतेचे उपासक होते कलिंगाच्या युद्धानंतर त्यांच्या मनात निर्माण झालेल्या वेदना आणि पश्चाताप यामुळे त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना वंदन केले आणि तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला.देश विदेशात क्रांती घडवून आणली. सत्तेचा उपयोग प्रजेच्या उद्धारासाठी कसा करावा हे कृती मधून आदर्श देणाऱ्या चक्रवर्ती कार्यसम्राट अशोकाबद्दल आपण वाचन करणे महत्वाचे आहे.मानवासोबतच मुक्या प्राण्यांसाठी दवाखाने उघडणारे तसेच रस्ते,विहिरी आणि वृक्षारोपणासाठी लोक कल्याणकारी कामे करणारे ते पहिले क्रांतिकारी,कल्याणकारी राजे होते.भारताच्या तिरंग्यावरील अशोक चक्र हे त्यांच्याच गतिशील आणि न्यायपूर्ण विचारांचे प्रतीक आहे. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सम्राट अशोका जयंती निमित्त त्यांच्या न्यायप्रिय विचारांना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमावेळी मिलिंद जलसा कला निकेतन मंडळाचे आजी- माजी कलाकार,गायक,तसेच डी.सी.सी क्रिक्रेट क्लब चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या