Top Post Ad

विकास कामांमध्ये गैरव्यवहार.... श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

गेल्या चार वर्षांत ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारकडून तब्बल ४९५३ कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला. मात्र, त्यातील २५६० कोटी रुपये फक्त गटार आणि पायवाटांवर खर्च करण्यात आले. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली दिसत नाहीत अशी शंका भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केली आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढून सखोल चौकशी करण्याची मागणी पेंडसे यांनी केली आहे. शुक्रवारी झालेल्या ठाणे महानगरपालिका अर्थसंकल्पीय सभेत मृणाल पेंडसे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. आयुक्तांनी सादर केलेल्या ‘स्वप्नवत’ अर्थसंकल्पावर टीका करताना त्यांनी म्हटले, “ठाणेकर नागरिकांना सकाळी अंघोळीसाठी टँकर बोलवावा लागत असेल तर करोडो रुपयांचे प्रकल्प काय करायचे आहेत? प्रथम ठाणेकरांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा, मग मोठमोठी स्वप्ने दाखवा असा टोलाही पेंडसे यांनी लगावला.

गेल्या तीन वर्षांत पालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्या काळातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवरही त्यांनी घणाघात केला. “या कामांची चौकशी झाली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आणि कडक भूमिका घेऊ,” असा स्पष्ट इशारा मृणाल पेंडसे यांनी प्रशासनाला दिला. ठाणे महापालिकेच्या मालकीच्या मालमत्ता बोगस लाभार्थ्यांना देण्याचा सपाटा महापालिकेने लावला होता. त्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप पेंडसे यांनी केला. त्या घोटाळ्याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर राज्य सरकारने सवलतींचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे शहरातील हाऊसिंग स्टॉक वाढेल आणि घरांच्या किंमती कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, परवडणाऱ्या घरांचे स्वप्न मुळ ठाणेकरांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. “घरे परवडत नाहीत म्हणून मुंबईकर जसा मुंबईबाहेर फेकला गेला, तसा आता ठाणेकरही ठाण्याबाहेर फेकला जाईल,” अशी भीती मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com