..ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक/नगरसेविकांना पेन्शन सुरू करण्याच्या मागणीबाबत माजी महापौर मा. मीनाक्षी शिंदे यांनी महापौरांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पत्रात “आमदार-खासदारांना पेन्शन मिळते, त्यामुळे नगरसेवकांनाही पेन्शन मिळावी व दोन वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन लागू करावी” अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
या मागणीविरोधात ठाणे शहरातील जागरूक नागरिक अजय जेया यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या मा. महापौरांना निवेदन देऊन तीव्र विरोध नोंदविला. अजय जेया यांनी स्पष्ट केले की, नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी ही अनावश्यक, अनुचित आणि करदात्यांच्या पैशावर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी आहे.
अजय जेया यांनी सांगितले की, महानगरपालिकेचा निधी हा जनतेच्या करातून जमा होतो आणि तो रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आणि विकासकामांसाठी वापरला गेला पाहिजे. अशा निधीतून लोकप्रतिनिधींना पेन्शन देणे म्हणजे जनहिताच्या निधीचा गैरवापर ठरेल.
त्यांनी पुढे नमूद केले की, आजच्या काळात बहुतांश नगरसेवक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून अनेक नगरसेवक आधीच संपन्न आहेत. त्यामुळे पेन्शनची मागणी करणे म्हणजे विकासकामांवर परिणाम करणारी बाब ठरेल.
अजय जेया यांनी महापौरांकडे मागणी केली की, असा कोणताही प्रस्ताव पुढे नेण्याआधी प्रत्येक नगरसेवकाचे व त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण आर्थिक ऑडिट, मालमत्ता तपासणी व उत्पन्नाचे स्रोत सार्वजनिक करणे बंधनकारक करावे. तसेच जनतेची स्पष्ट परवानगी (मॅंडेट) घेऊनच अशी मागणी मान्य करावी.
शेवटी अजय जेया यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर नगरसेवकांना पेन्शन देण्याचा निर्णय जबरदस्तीने लागू करण्याचा प्रयत्न झाला, तर ठाणेकर नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करून तीव्र विरोध करतील
0 टिप्पण्या