भगवान बुद्धांच्या अस्तित्वाने ज्ञानमय झालेल्या अमरावतीची निवड आंध्र प्रदेश सरकारने नवीन राजधानीसाठी केली आहे. या राजधानीचा लोगो आंध्रप्रदेश सरकारने आज प्रसिद्ध केला. सुमारे 33 हजार एकर जमिनीवर ही नवीन राजधानी वसविण्यात येत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या राजधानीची संकल्पना सुमारे दहा वर्षांपूर्वी मांडली होती. त्यांची सत्ता गेल्यावर हे काम रेंगाळले होते. ते पुन्हा सत्तेवर आल्यावर यासाठी जोरदार प्रयत्न केले. एक एप्रिल 2026 रोजी लोकसभेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार आता अमरावती आंध्रप्रदेशची कायमस्वरूपी राजधानी घोषित करण्यात आली आहे. ही राजधानी वसविण्यासाठी सुरुवातीचा एकूण खर्च 33 हजार कोटी रुपये एवढा होता. आता तो 65 हजार कोटी रुपयांवर गेला आहे.
भगवान बुद्धांचा भव्य पुतळा व त्या भोवती राजधानीचे शहर आणि आंध्र प्रदेशची विधानसभा असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. अमरावती हे कृष्णा नदीच्या काठावर असलेले अत्यंत महत्त्वाचे प्राचीन बौद्ध तीर्थक्षेत्र आहे. भारतातील मोठ्या बौद्ध स्तूपांपैकी एक स्तूप अमरावतीत आहे. पूर्वी हे बौद्ध ज्ञान केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. येथूनच चीन आणि जपानपर्यंत बौद्ध तत्वज्ञान पसरले असेही मानले जाते. कृष्णा नदीच्या काठी सुमारे साडेचार एकरात सव्वाशे फुटांचा भगवान बुद्धांचा ध्यानस्थ पुतळा आहे. येथील अमरावती कला शैली प्रसिद्ध असून बुद्धांच्या जीवनावरील कथा येथील शिल्पात कोरल्या आहेत. भगवान बुद्धांच्या ज्ञानमय मार्गातून आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती जगभरात ज्ञान केंद्र म्हणून पुढे आणण्याचा संकल्प चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे
0 टिप्पण्या