तेली समाजाचा पारंपारिक व्यवसाय तेलघाणी चालविणे हा आहे. परंतू आधुनिक काळात मोठ्या तेल कंपन्यांसमोर हा पारंपारिक व्यवसाय संकटात सापडला आहे. हा उद्योग आणि शुध्द तेल बनविण्याची परंपरा जीवंत राहण्यासाठी तेली समाजातील बांधवांना आधुनिक तेलघाणी चालवण्यासाठी योग्य ते आर्थिक अनुदान आणि खेळते भांडवल देणारी विशेष शासकिय योजना तयार करण्यात यावी. तसेच तेली समाजातील ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मुंबई, नागपूर आणि पुणे यासारख्या शैक्षणिक उपनगरांमध्ये येत असतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शहरामधील महागडा, राहण्याचा आणि खाण्याचा खर्च परवडत नाही त्यामुळे मुंबई, नागपुर आणि पुणे या तिनही शहरांमध्ये तेली समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासकिय स्तरावर सुसज्ज वसतीगृहे उभारण्यात यावीत.
या आणि समाज हिताच्या इतर मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा अन्यथा पुढील अधिवेशनादरम्यान आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा राज्य तेली समाज समन्वय समिती, महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आला. याबाबत आज समितीचे अध्यक्ष प्रा. प्रकाश डवले अकोला, सरचिटणीस प्रशांत शेवतकर अकोला, उपाध्यक्ष अॅड. किशोर लांजेवार भंडारा, डॉ. अभिजीत डवले नागपूर, हिरामण सांगे पुणे, घनश्याम बोराखडे मुंबई यांनी प्रेस क्लब मुंबई येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र राज्यात तेली समाजाची लोकसंख्या अत्यंत लक्षणीय असून ती जवळजवळ ७७ लक्षापेक्षा जास्त आहे. विशेषतः नागपूर, गोंदिया, अकोला, वर्धा, अमरावती आणि बीड या जिल्हयामध्ये समाजाची घनता व संख्या सर्वाधिक आहे. या प्रमुख जिल्हयांसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जसे नागपूर, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जळगाव, धुळे, पुणे आणि मुंबई मध्ये समाज सामाजिक, आर्थिक आणि राजकीदृष्ट्या अत्यंत संवेदनशिल आणि निर्णायक भुमिकेत आहे. असे असुनही लोकसंख्येच्या प्रमाणात समाजाला अजूनही अपेक्षित प्रगती साध्य करता आलेली नाही. अनेकवर्षांपासून समाज आपल्या हक्कांसाठी संघर्ष करीत आहे. यासाठी शासनाने तेली समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाची घोषणा केली आहे. ही अत्यंत भूषणावह बाब आहे.
परंतू या महामंडळाला अद्यापपर्यंत आवश्यक निधी मिळालेला नाही. तसेच त्याचे पुर्ण क्षमतेने कार्यान्वयन सुरू झालेले नाही. हे महामंडळ केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरण्यासाठी संत संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाला तात्काळ निधी उपलब्ध करण्यात यावा व त्याचे कामकाज त्वरीत सुरू करण्यात यावे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत तेली समाजाचे योगदान मोठे आहे. समाजाची लोकसंख्या लक्षात घेता शासनाच्या विविध मंडळावर, समित्यावर आणि वैधानिक मंडळावर तेली समाजातील योग्य व कर्तृत्ववान व्यक्तिंना लोकसंख्येच्या योग्य प्रमाणात नियुक्त्या देण्यात याव्यात जेणेकरून समाजाला सत्तेत आणि प्रशासनात योग्य प्रतिनिधीत्व मिळेल. इत्यादी मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

0 टिप्पण्या