राज्यातील एकही प्राथमिक, माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालय बंद करू नये, प्रत्येक वर्गाला आणि प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, शिक्षणावरील सरकारी खर्च वाढवून तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्क्यांपर्यंत न्यावा, २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण देऊन शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, गाव, तांडा, वाडी-वस्ती तेथे शाळा हे धोरण कायम ठेवून एकच विद्यार्थी असला तरी शाळा सुरू ठेवावी, १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून हा निर्णय रद्द करावा नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचे खासगीकरण व बाजारीकरण वाढण्याची शक्यता अधिक असल्याने हे धोरण रद्द करावे. ग्रामीण, दलित, आदिवासी, बहुजन, कष्टकरी, भटके-विमुक्त आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी सर्वांना ‘केजी टू पीजी’ मोफत, समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून द्यावे, यासह विविध शैक्षणिक मागण्यांसाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने ५ ऑक्टोबर पासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमधून पालक, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संघटना, शिक्षणप्रेमी आणि सजग नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी राज्यभर जिल्हा, विभाग आणि तालुकास्तरावर प्रबोधन बैठका सुरू आहेत. सरकारने या मागण्यांवर निर्णायक बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आंदोलनाची व्यापक तयारी सुरू असून विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना आणि सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली. यावेळी कॉ. संपत देसाई सिद्धार्थ जगदेव तुषार सूर्यवंशी, संजय वेतुरेकर, दीप्ती शेलार आणि सुभाष मोरे यांच्यासह अनेक संस्था संघटनांनी आपले मत व्यक्त केले
0 टिप्पण्या