दलित पँथरचे शहीद नेते, पत्रकार आणि विचारवंत वसंत धामणकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त सांताक्रूझ (प.) येथील भीमवाडा येथे “शहीद वसंत धामणकर स्मृती समिती”च्या वतीने जाहीर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन नेते विवेक गोविंदराव पवार यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शन दलित पँथरचे संस्थापक ज. वि. पवार यांनी केले.या कार्यक्रमात ॲड. उत्तम जागिरदार, सुबोध मोरे, प्रा. डॉ. रमेश कांबळे, सुमेध जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. १९७४ साली नागपूरच्या इंदोरा परिसरात पँथर अधिवेशनासाठी गेले असताना वसंत धामणकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर भीमवाडा येथे झालेल्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. त्या ऐतिहासिक घटनेला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
कार्यक्रमात बोलताना ज. वि. पवार म्हणाले की, “वसंत धामणकर हे केवळ दलित पँथरचे लढवय्ये नेते नव्हते, तर ते एक सशक्त लेखक, अभ्यासू पत्रकार आणि प्रभावी वक्तेही होते. त्यांनी पँथर चळवळीत अनेक लढ्यांत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे चळवळीचे मोठे नुकसान झाले. आज देशात जातीयवाद आणि धार्मिक द्वेष वाढत चालला आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली समाज फोडण्याचे काम सुरु आहे. अशा परिस्थितीत लोकशाही वाचविण्यासाठी आणि आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी युवकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.”,
प्रचंड पावसातही सांताक्रूझ येथील अभिवादन सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १९३ व ४३३ महिला मंडळ, रतन अस्वारे, सो. ना. कांबळे, के. जी. पाठारे, महेंद्र जाधव, सुनिल गमरे, तुकाराम जाधव, विशांत तांबे, अनोज मोरे, संमोत कासारे, प्रभाकर गायकवाड, शैलेश पवार, मंगेश गमरे, संदिप सोरे, विजय गमरे, अक्षय गमरे, प्रसन्नजीत धोत्रे, संध्या पवार, ज्योती गमरे, रजनी गमरे, साधना सुरदास, वर्षा कदम, सुजाता गमरे, उन्नती जाधव, माधुरी मोहिते, पाईकराव बाई लसंघां जाधव, शोभा पवार, सुनिल सुगंध आणि विक्रांत पवार यांनी परिश्रम घेतले. सभेच्या शेवटी शहीद वसंत धामणकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

0 टिप्पण्या