मुंबईतील हवामान आरोग्यदायी राहावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी यंत्रणेला दिलेत.के पूर्व तसेच एच पूर्व विभागात आज २८ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करून विविध विकासकामांचा व प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा डॉ. ढाकणे यांनी घेतला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. ढाकणे यांनी विविध ठिकाणची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.या पाहणीदरम्यान के पूर्वचे सहायक आयुक्त श्री. नितीन शुक्ला, एच पश्चिमच्या सहायक आयुक्त श्रीमती मृदुला अंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी व पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबईतील हवामान आरोग्यदायी राहावे, यासाठी पुढील काळातही नियमित पाहण्या, समन्वयात्मक कारवाई व कठोर अंमलबजावणी सुरू राहणार आहे.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. ढाकणे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामकाज, उच्च न्यायालय व शासकीय वसाहत प्रकल्पाचे स्थळ, पानबाई शाळेच्या परिसरातील व लगतच्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच खेरवाडी जंक्शन येथील सर्व्हिस रोडची पाहणी करून तेथील स्वच्छता, धूळ नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
बांधकाम स्थळांवर धूळ उडू नये यासाठी पाण्याची नियमित फवारणी, साहित्य झाकण्यासाठी हिरव्या जाळीचा (ग्रीन नेट) वापर, बांधकाम साहित्य वाहतूक करताना झाकणांचा वापर, तसेच रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता केली जात आहे की नाही, याची तपासणी यावेळी करण्यात आली. शाळा परिसर व दाट वस्ती असलेल्या भागात विशेष काळजी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक तेथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर व संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ.ढाकणे यांनी सांगितले आहे .
रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्यावर न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दंड ठोठावला, हवेतील प्रदुषणाची न्यायालयाला दखल घ्यावी लागली, ताशेरे ओढले आणि स्वत लक्ष घातले. मुंबई महानगरापालिकेतील प्रशासक राजच्या माध्यमातून भाजपा महायुती फक्त स्वतचे खिसे भरण्याचे काम करत आहे. मुंबईतील रस्ते, प्रदुषण, आरोग्य सुविधा याकडे सत्ताध्रायांचे साफ दुर्लक्ष केलेले आहे. आता कांजूरमार्गच्या डंपिग ग्राऊंडवरून न्यायालयाने बीएमसीला फटकारले आहे. तसेच वायूप्रदूषणावरही न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले. आता कांजूर डंपिंग ग्राऊंडमुळे होण्राया दुर्गंधीबाबत तासाभरात निर्णय घ्या असा आदेश मुंबई महानगरपालिकेला न्यायालयाने दिला. गेली तीन वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता राबविण्राया महायुतीची अकार्यक्षमता यातून स्पष्ट दिसते. मुंबईकरांच्या प्रश्नांवर भाजपा महायुतीचा एकही नेता अवाच्छरही काढत नाही. आपला कुचकामीपणा दिसू नये म्हणून नेहमीप्रमाणे धर्माच्या नावाने विवाद निर्माण केला जात आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व देशाची आर्थिक राजधानी आहे पण केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असूनही मुंबईचा फारसा विकास झालेला नाही. लाडका उद्योगपती व कंत्राटदार यांच्यासाठी मुंबई विकण्यास काढली आहे. मुंबईकरांना मुलभूत सुविधाही देऊ न शकण्राया भाजपा महायुतीला आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत घरी बसवा, - सचिन सावंत (सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व मुख्य प्रवक्ते-मुंबई काँग्रेस)
0 टिप्पण्या