: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे झालेल्या भीषण अपघातात, त्यांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक विदीप दिलीप जाधव यांचेही दुःखद निधन झाले. ठाण्यातील कळवा-विटावा परिसरातील रहिवासी असलेल्या विदीप जाधव यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
कर्तव्यदक्ष योद्धा आणि निष्ठावान सहकारी विदीप जाधव हे केवळ एक अंगरक्षक नव्हते, तर ते अजितदादांचे सावलीसारखे सोबती मानले जात. अत्यंत शांत स्वभाव, कामाप्रती असलेली निष्ठा आणि दिलेले कर्तव्य चोख बजावण्याची जिद्द हे त्यांचे वैशिष्ट्य होते. विटावा गावातील एक उमदा आणि कर्तृत्ववान तरुण म्हणून त्यांची ओळख होती.
विटावा गावावर शोककळा : विदीप यांच्या निधनाची बातमी कळताच कळवा आणि विटावा परिसरात सन्नाटा पसरला आहे. आपल्या गावातील एक तरुण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात महत्त्वाच्या जबाबदारीवर होता, याचा गावाला सार्थ अभिमान होता. मात्र, नियतीने घात केलेल्या या अपघातात विदीप यांनी आपल्या नेत्यासोबतच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि कुटुंब असून, या धक्क्यातून सावरणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली : एक कर्तव्यनिष्ठ जवान, एक सच्चा योद्धा आणि समाजासाठी आदरणीय असलेला एक उत्तम माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे. ही हानी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि जाधव कुटुंबाला या अथांग दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

0 टिप्पण्या