बिल्डर रहेजाचे ऑफिस तोडफोड प्रकरणी वंचितच्या कार्यकर्त्यांची न्यायालयाने केली सुटका
'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा मराठी तरूणाला मारहाण केली.. या प्रकरणात सुशील रहेजाविरोधात गोंवडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहेजाच्या डॉ सी जी गिडवाणी रोड, रहेजा होम्स, चेंबूर येथील कार्यालयात तक्रारदार व्यक्ती शिपाई म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी कार्यालयीन मीटिंग होती. तक्रारदार व्यक्तीला कागदपत्रे जोडून स्टॅपल लावण्याचं काम सांगण्यात आलं होतं. दरम्यान, कागदपत्रावर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजानं मराठी तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केली.
सुशील रहेजाने तक्रादार व्यक्तीला 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत मारहाण केली तसेच तक्रारदार एका विशिष्ट समाजाचा असल्याने त्याला पुन्हा नोकरीवर राहता येऊ नये, असे वर्तन कार्यालयात ठेवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या घटनेनंतर तक्रारदार व्यक्तीने थेट गोवंडी पोलीस ठाणे गाठले. तसेच सुशील रहेजा याच्यावरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गोवंडी पोलिसांनी रहेजाविरोधात कलम ११५ बीएनएस २०२३सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी सुशील रहेजावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा त्याला पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.अॅट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिल्डर सुशील रहेजा अद्याप मोकळा असताना, दुसरीकडे त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याने खळबळ माजली होती. काल रात्री पोलिसांनी वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई आणि इतरांना बिल्डर रहेजाचे ऑफिस तोडफोड प्रकरणी अटक केली होती. आज त्यांना भोईवाडा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले आहे.
ही अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे की, एखाद्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल तर त्या गुन्ह्यात आरोपींना नोटीस देणे बंधनकारक असते. त्या गुन्ह्यात जर आरोपी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत असेल तर त्याला अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे कायदा सांगतो. मुंबई पोलिसांनी कुठलीही नोटीस न देता थेट अटक केली होती. मुंबई पोलिसांनी बिल्डर रहेजा आणि राजकीय पक्षांच्या दबावाखाली हे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

0 टिप्पण्या