राज्यात नागरिकीकरणाचा सर्वाधिक वेग ठाणे शहरामध्ये आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकीला अनेक मर्यादा येत असल्याने 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती, तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरूवात झाली. मात्र, आजही मेट्रो मार्गिका आणि संबंधित इतर कामे काहीशी अपूर्ण आहेत, खर्च कोट्यवधीत वाढत असला तरी प्रत्यक्ष काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने आजही नागरीकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने ठाणेकर संताप व्यक्त करत आहेत. मागील दहा ते बारा वर्षापासून घोडबंदर रोडवर कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासन केवळ काही तकलादू उपाययोजना करीत असल्याचे दाखवत असल्याचा आरोप ठाणेकरांनी केला. प्रत्यक्षात या वाहतूक कोडीचा त्रास केवळ घोडबंदर रोडवरील नागरीकांनाच नाही तर बाहेरून ये-जा करणाऱ्या वाहनांनाही होत आहे. यामुळे प्रचंड वेळ वाया जात असल्याचे मत अनेक वाहनधारकांनी व्यक्त केले.
ठाणे शहरात जड अवजड वाहने सकाळी ७ ते १० या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धूळफेक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामध्ये सर्विस रोडचे सुद्धा विलीनीकरणाचे काम सुरू आहे. ठाणे शहराचे घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने होत असलेले शहरीकरणामुळे या परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे राहणारे नागरिक नोकरी निमित्त आपली खाजगी वाहने घेऊन घरा बाहेर पडत असतात. अवजड वाहने सकाळी ७ ते १० या वेळेत बंद राहण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहने सोडली जात आहेत. मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मुख्य रस्त्याशी जोडत असल्याने वाहतूक कोंडी वाढतच आहे. परिणामी आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स करीता मार्ग कठीण होत आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेने सेवा रस्त्याचे एकत्रीकरण सुरू ठेवले आहे. पण यातून वाहतूक कोंडी कमी होण्यापेक्षा अधिक होत असल्याचे मत वाहनधारकांनी व्यक्त केले.
दररोज जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करणारे ठाणेकर मेट्रोकडे डोळे लावून आहेत. गेल्या चार वर्षात शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या तारखा घोषित करून देखील ठाणे मेट्रोचे काम अपूर्णच आहे. चारवेळा देण्यात आलेल्या डेडलाईन उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास आलेला नाही. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून २०१७ पासून मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली. ग्रीन लाईन अंतर्गत येणाऱ्या ठाणे मेट्रोची पहिली चाचणी २२ सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आली. या ट्रायल रननंतर इतर सर्व तांत्रिक गोष्टी तपासून डिसेंबर 2025 पर्यंत ठाण्यातील मेट्रो सुरू होणार असल्याचं सांगितले गेले. मात्र आज मार्च 2026 उजाडले तरीही याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे आश्वासन फक्त निवडणुकीचा जुमलाच ठरत आहे. मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला गेला का असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत. प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधूरा असून ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून मुक्तता ही केवळ कागदावरच आहे असे मत संतप्त ठाणेकरांनी व्यक्त केले.

0 टिप्पण्या