ममता प्रतिष्ठानने दोन दिवसीय ‘महापुरुषांचा वैचारिक जयंती सोहळा’ नुकताच मरोळ, अंधेरी येथे साजरा केला. भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती, राज्यघटनेची प्रस्तावना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे, नाथपंथी डवरी गोसावी समाज आणि मातंग समाज यांचा इतिहास आणि आदर्श व्यक्ती यांचे माहिती प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आदींचे उदघाटन सोमवार, १३ एप्रिल एप्रिल सायंकाळी पार पडले. यावेळी रेल्वे, बँकिंग क्षेत्रातील नोकरी भरती संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास रेल्वेचे अधिकारी प्रशांत डोळस आणि माजी अधिकारी एस. के. सिंग यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी भाजप नेते उमेश राणे, अॅड. अमित ससाणे देखील उपस्थित होते.
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर संविधान म्हणजे काय? या विषयावर वकील व संविधान अभ्यासक अॅड.निलेश जगन्नाथ खानविलकर यांनी व्याख्यान दिले. यावेळी कॉँग्रेसचे नेते इमरान शेख उपस्थित होते.
सायंकाळी ६.३० मातंग समाज आधुनिक होत आहे का? या विषयावर लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत आणि ‘नाथपंथी डवरी गोसावी समाज : काल, आज आणि उद्या’ या विषयावर भटक्या व विमुक्त जाती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी व्याख्यान दिले. यावेळी वंचित घटकातील कर्तृत्ववान अशा उच्चशिक्षित डॉ.निशांत राजेंद्र बोराडे, इंजि. स्वप्नील प्रेमजी सूर्यवंशी आणि उद्योजिका संजना नैनेश जगताप या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक प्रमोद सावंत उपस्थित होते. कार्यक्रमदरम्यान उपस्थितांना संविधानाच्या उद्देशीकाचे वाटप करण्यात आले.
महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीला कळावे हा या महापुरुषांच्या वैचारिक जयंती सोहळ्याचा उद्देश होता, असे ममता प्रतिष्ठानचे सचिव प्रमोद सावंत यांनी म्हटले. या आगळ्या वेगळ्या जयंतीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
***

0 टिप्पण्या