महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेते, निकृष्ट दर्जाचे तूप व खवा उत्पादक तसेच रसायनांच्या सहाय्याने फळे पिकवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवार, २६ मे रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली. येथे रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवण्यात आलेले तब्बल ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या आंब्यांची किंमत सुमारे २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. आरोग्यास घातक रसायनांचा वापर करून फळे पिकवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. FDA अधिकाऱ्यांनी छापा टाकून तब्बल ४० हजार ९६० रुपयांचे संशयित तूप जप्त केले. या प्रकरणात संबंधित विक्रेते आणि उत्पादकांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बुधवारी २७ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. येथे तब्बल २१५ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला. या खव्याची किंमत अंदाजे ४७ हजार ३०० रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
बुधवारी २७ मे रोजी ठाणे जिल्ह्यात एक मोठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. यामध्ये १,४९,७२४ रुपयांचे खाद्यतेल, ९३,८३० रुपयांचे फरसाण, २,०६,८०० रुपयांचे तूप, ८,१९० रुपयांचे हक्का नुडल्स, १७,१०० रुपयांची ताडी, ५४,०९६ रुपयांचे शरबत आणि १,९७,६४० रुपये किंमतीच्या डिंकाचा (गम अरेबिक) समावेश आहे. याशिवाय, याच दिवशी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४,५३,३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे कडक आवाहन केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
“भेसळयुक्त, निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक, शिस्तप्रिय आणि पारदर्शक प्रशासनशैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय पदांवर काम करताना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे FDA विभागात त्यांच्या नियुक्तीनंतर अन्नभेसळ, बनावट औषधे, परवान्यांतील गैरव्यवहार तसेच ऑनलाइन औषध विक्रीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यभरातील नागरिकांकडून या कारवायांचे स्वागत केले जात असून “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई व्हावी” अशी मागणी जोर धरत आहे. FDA विभागाची ही धडक मोहीम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
0 टिप्पण्या