समृद्धी महामार्ग – महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट. नागपूर-मुंबई अंतर 16 तासांवरून 8 तासांवर आलं. पण या ‘स्मार्ट’ महामार्गावर एक जुना, बुरसटलेला रोग ठाण मांडून बसलाय – RTO चा वसुली अड्डा... नेमकं घडतंय काय?- सिन्नर टोल नाका, SMBT हॉस्पिटलजवळचा टोल नाका आणि इगतपुरी टोल नाका – या तीनही ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९, रोज *RTO ची गाडी व अधिकारी-कर्मचारी ठाण मांडून बसतात*. जिथून गाड्या समृद्धीवर चढतात किंवा उतरतात, नेमकं त्याच पॉइंटला. ना तिथे वाहतूक कोंडी, ना अपघात, ना स्पीडचा प्रश्न. तरीही खासगी कार, टेम्पो, ट्रक थांबवले जातात. “लायसन्स दाखवा, PUC कुठे आहे, इन्शुरन्स? RC बुक?” कागदपत्रं बरोबर असली तरी ‘केस करतो’ चा धाक*. शेवटी 500, 1000, 2000 ची सेटलमेंट करुन (गाडीच्या साइजप्रमाणे दर) पुढील प्रवास चालू. दिवसाला एका नाक्यावर लाखांच्या घरात वसुली होते. दिवसभरात २-४ गाड्यांवर दंडाची पावती फाडली जाते – बाकी सगळा ‘ऑन द स्पॉट’ व्यवहार. ना पावती, ना रेकॉर्ड.
मूळ प्रश्न RTO ची तिथे गरजच काय?- समृद्धी महामार्ग Access Control आहे: इथे प्रवेश करतानाच टोल नाक्यावर *Fastag* नंबर प्लेट स्कॅन होते. ओव्हरलोड, नंबर प्लेट नसलेली गाडी आत येऊच शकत नाही. 24x7 CCTV + स्पीड कॅमेरे: प्रत्येक 5 किमीला कॅमेरे. स्पीड, लेन कटिंग, राँग साइड – सगळं ऑटोमॅटिक चलान जातं. मग RTO ने रस्त्यात उभं राहून गाड्या का थांबवायच्या? कायद्याने अधिकार आहे का?* तर मोटार वाहन कायदा कलम 213 नुसार RTO ला तपासणीचा अधिकार आहे. पण केवळ वसुलीसाठी रोज रोज तेथे उभं राहून गाड्या थांबवणं, वाहतुकीला अडथळा करणं हे कायद्याच्या भावनेविरुद्ध आहे. म्हणजे सुविधा दिली महामार्गाची आणि मानसिकता ठेवली वसुलीची
यामुळे काय होते शेकडो किमी.प्रवास करुन आलेला कुटुंब प्रमुख, टुरिस्टवाला त्याला टोल भरल्यावर 200 मीटरवर पुन्हा RTO थांबवतो. ५००,१००० देऊन वेळ तर जातोच, पण मानसिक त्रासही होतो. .बाहेरच्या राज्यातून येणारा व्यावसायिक, पर्यटक पहिल्यांदा समृद्धीवरून येतो आणि टोलच्या बाहेर ‘हप्ता’ द्यावा लागतो. तो काय इमेज घेऊन जाणार? तर महाराष्ट्राची बदनामी. आता नाशिक,सिन्नर, इगतपुरीच्या पत्रकारांनी ‘स्टिंग’ऑपरेशन कराच स्थानिक वृत्तपत्र, टीव्ही चॅनल, यूट्यूब न्यूज पोर्टलच्या पत्रकारांनी कॅमेरा घेऊन सिन्नर, SMBT, इगतपुरी टोलवर जा. RTO अधिकाऱ्याला थेट जाब विचारा:
“सर, GR कुठला आहे? रोज इथे उभं राहण्याचा आदेश कुणी दिला? आज किती पावत्या फाडल्या आणि किती कॅश जमली? बॉडी कॅमेरा आहे का?” पत्रकारांनी लाइव्ह केलं की 50% वसुली जागेवरच बंद होईल. तसेच परिवहन आयुक्तांना जाब विचारा: @Transport_Maha, @CMOMaharashtra यांना टॅग करून व्हिडिओ ट्विट करा. माहिती अधिकारात विचारा – 2026 मध्ये या 3 टोलनाक्यांवर RTO ने किती वाहनं तपासली? किती दंड वसूल केला? किती केसेस ‘ऑन स्पॉट सेटलमेंट झाल्या? लेखी उत्तर मागा.
प्रवाशांना विनंती RTO ने जर तुम्हाला थांबवलं तर गाडीतून उतरू नका खिडकीतूनच बोला.डिओ शूटिंग सुरू करा* - तो तुमचा कायदेशीर अधिकार आहे. -पावतीशिवाय एक रुपया देऊ नका. “पावती द्या, ऑनलाइन भरेन” सांगा. - ‘महाराष्ट्र परिवहन तक्रार व्हॉट्सअप क्रमांक 91521 93030’ वर व्हिडिओसह तक्रार करा.
नाशिकचे *खासदार राजाभाऊ वाजे, सिन्नरचे आमदार माणिकरावजी कोकाटे ( माजी मंत्री), इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर काय करतात? समृद्धी महामार्ग तुमच्या जिल्ह्यातून,तालुक्यातून जातो, तुमच्या मतदारांची राजरोसपणे लूट होते. पण त्यावर तुमचे लक्ष नाही,जाऊन त्या अधिकाऱ्यांना *जाब* विचारा ना. विधानसभेत प्रश्न विचारा RTO ला टोलच्या बाहेर उभं राहण्याची स्टँडिंग ऑर्डर* आहे का? आणि हि जनतेची होत असलेली लूट थांबवा ही तुम्हाला,तुमच्या जिल्ह्यातील,तालुक्यातील नागरिक,मतदार म्हणून नम्र विनंती.
समृद्धी महामार्ग 55,000 कोटी खर्चून बांधला. जगातले कॅमेरे, सेन्सर लावले.* मग पेपर तपासायला माणूस रस्त्यात का उभा करायचा? जर सगळं डिजिटल आहे, तर RTO ने *डेटा सेंटर* मध्ये बसून नियम मोडणाऱ्यांना ई-चलान पाठवावं. टोलच्या बाहेर *RTO* उभा राहतो तो *सुरक्षेसाठी* नाही,तर *‘सुरक्षित वसुलीसाठी*.मला तर असे वाटते हा समृद्धी महामार्ग नसून, काही *अधिकाऱ्यांच्या ‘समृद्धी’चा* महामार्ग झालाय.
विनोद नाठे / विकास काजळे - इगतपुरी
0 टिप्पण्या