ठाणे-पालघर जिल्हा बँक निवडणूक ही महायुतीमधील अंतर्गत वर्चस्वाची होती. एकनाथ शिंदे-हितेंद्र ठाकूर-किसन कथोरे यांच्या युती विरोधात भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यात ही लढत होती. बँकेवर गेली १० वर्षे सहकार पॅनलचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. आज झालेल्या मत मोजणीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवाल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचा करिष्मा अजूनही असल्याचे दाखवून दिले .वसई विरार मधील चारही जागा निवडून अनन्या बरोबरच पालघर जिल्ह्यातील ४ जागा हि निवडून आणण्यात हितेंद्र ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. मात्र या प्रस्थापितांच्या लढतीमध्ये दोन्ही मुख्य पॅनलमध्ये नसलेले निलेश सांबरे यांचा दणदणीत विजय झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
विक्रमगड तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी प्रस्थापितांना धुळ चारत विजय संपादन केला असून, त्यांची संचालकपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हास्तरीय ओबीसी राखीव मतदारसंघात प्रस्थापितांच्या बलाढ्य पॅनेलविरुद्ध त्यांनी अत्यंत अटीतटीची लढत दिली. या लढतीत अवघ्या १०० मतांचेच अंतर राहिल्याने, सांबरे यांनी प्रस्थापितांच्या वर्चस्वाला आणि गडाला मोठे सुरुंग लावल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी ज्या प्रस्थापितांनी निलेश सांबरे यांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान देण्यास नकार दिला होता, त्याच प्रस्थापितांना या निकालाने सांबरेंनी आपली ताकद दाखवून दिली. पाठीशी कोणत्याही मोठ्या पॅनेलचा किंवा राजकीय गॉडफादरचा आधार नसतानाही, सांबरे यांनी स्वतःच्या बळावर मोठा विजय मिळवला.
आपल्या विजयाबाबत बोलतांना निलेश सांबरे म्हणाले, "हा विजय माझ्या सामाजिक कामावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. सभासदांची हीच साथ आमची खरी ताकद आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शक, प्रामाणिक आणि केवळ सभासदांच्या हिताचे काम यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील, हा माझा शब्द आहे.

0 टिप्पण्या