डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी, पुरोगामी महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते, तत्त्वनिष्ठ संपादक-प्रकाशक, आदर्श धम्मउपासक आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून प्रा. विलास वाघ महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. खानदेशातील धुळे जिल्ह्याच्या मोराणे गावचे प्रा. विलास वाघ आपल्या उमेदीच्या वयात पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात राहून शिक्षण, संपादन, प्रकाशन आणि सामाजिक कार्य या माध्यमांतून त्यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीत भरीव योगदान दिले. सर्वंकष समाजपरिवर्तनाचा ध्येयवाद सत्यात उतरवण्यासाठी विद्यापीठीय प्राध्यापकीचा त्याग करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधनाच्या कार्याला वाहिले.
'सुगावा' मासिक आणि 'सुगावा प्रकाशन' या माध्यमातून त्यांनी बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर-मार्क्स या महानायकांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. आपल्या लिखाणातून दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, देवदासी, कष्टकरी आणि वंचित समाजघटक या सर्वांचे नानाविध प्रश्न त्यांनी जोरकसपणे मांडले. इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांची पुस्तकं भाषांतरित करून आणि मराठीतले समाजपरिवर्तनवादी साहित्य प्रकाशित करून त्यांनी मराठी साहित्याचे विचारविश्व समृद्ध केले. आंबेडकरवाद, मार्क्सवाद, समाजवाद आणि गांधीवाद या विचारप्रवाहांचा समन्वय साधून समाजक्रांतीचा ध्यास त्यांनी जनमानसात पेरला. सनातनी प्रवृत्तींच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन वर्ग, जात आणि स्त्रीदास्य निर्मूलनाचा ध्यास त्यांनी आयुष्यभर निष्ठेने जपला. बुद्धाची करुणा समाजमनात रुजवत त्यांनी आपले आयुष्य मानवतावादी मूल्यांसाठी अर्पण केले.
0 टिप्पण्या